vikasit krishi samkalp abhiyan

सुधारित शेतीसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा -डॉ.राकेश अहिरे

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर-१ च्या वतीने विकसित कृषी संकल्प अभियानाचा सहावा दिवस उत्साहात साजरा

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात राबविण्यात येत असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियान-२०२५ viksit krishi sankalp abhiyan 2025  च्या सहाव्या दिवशी दिनांक ०३.०६.२०२५ रोजी कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत पैठण तालुक्यातील तालुक्यातील बिडकीन, शेकटा, तोंडोळी, लोहगाव, लोहगाव बु. आणि मुलानी वडगाव या गावांमध्ये जाऊन शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी बिडकीन येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.राकेश अहिरे, संचालक विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, आयसीएआर, आयव्हीआरआय, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ.अमोल भालेराव, गावचे अशोक धर्मे, मंडळ कृषी अधिकारी राधाकृष्ण कारले, इफकोचे जिल्हा व्यवस्थापक कलिम शेख यांची उपस्थिती होती. तसेच केव्हीकेच्या प्रमुख डॉ.दिप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ डॉ.संजूला भावर, डॉ.बस्वराज पिसुरे, श्री.सतीश कदम यांच्यासह गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.राकेश अहिरे म्हणाले की, विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान विकसित करून उपलब्ध करून दिलेले असून त्यामध्ये सुधारित वाण, सुधारित लागवड पद्धती, कृषी यांत्रिकीकरण चा प्रभावी वापर, जैविक निविष्ठा इत्यादीचा समावेश आहे. या सर्व तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी अवलंब करावा जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याकडील मोबाईलचा देखील शेतीसाठी प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. यासाठी शासनामार्फत महाविस्तार नावाचे मोबाईल ऍप विकसित करण्यात आलेले असून त्याचा वापर सर्व शेतकरी बांधवांनी करावा. तसेच ड्रोनचा वापर हा अत्यंत फायदेशीर दिसून येत असून शेतकरी बांधवांनी ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा शेतीसाठी वापर करावा.

या अभियानात शास्त्रज्ञांनी खरीप हंगाम पूर्व नियोजन, पशुधन व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय उभारणी, फळबाग लागवड तंत्रज्ञान, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, शासनाच्या विविध योजना, शेतीमध्ये सेंद्रिय घटकांचा वापर, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, महिला आरोग्य व्यवस्थापन, महिला गृह उद्योग उभारणी, माती परीक्षण व जमीन आरोग्य व्यवस्थापन, शेतीसाठी ड्रोनचा वापर या आणि अशा विविध विषयावर शेतकरी बांधवांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकरी बांधवांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे सर्व शास्त्रज्ञांच्या वतीने देण्यात आली. यासोबतच गावातील प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा सर्व सहभागीना सांगण्यात आल्या. शेतकरी बांधवांचे प्रत्याभरण घेऊन त्यानुसार शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.सोबतच शेतकरी बांधवांच्या प्रक्षेत्रावर भेटी देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेऊन शेती संदर्भातील योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी केले तर आभार डॉ.संजूला भावर आणि सूत्रसंचालन डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केले.

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *