krushi salla for crop management

krushi salla: वाढत्या तापमानाचा परिणाम: पिकांचे करा असे व्यवस्थापन

krishi salla : सध्या मराठवाडा भागात वाढत असलेल्या कमाल तापमानामुळे आणि बाष्पोत्सर्जनाच्या वेगात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना, फळबागांना, भाजीपाला व फुलपिकांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने दिला आहे. यासाठी विविध पिकांनुसार हवामान आधारित कृषि सल्ला जारी करण्यात आला आहे. हा सल्ला दिनांक २५ एप्रिलपासून पुढील आठ दिवसांसाठी आहे.

पिक व्यवस्थापन

ऊस पिकासाठी आवश्यकतेनुसार पाणी देणे गरजेचे आहे. ऊसात तण नियंत्रणासाठी खुरपणी करावी. खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरपायरीफॉस किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल यापैकी योग्य कीटकनाशक पाण्यात मिसळून पावसाची उघडी पाहून फवारावे. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डायमिथोएट याचा वापर करावा. हळदीची काढणी, उकडणे व वाळवणीची कामे पावसाचा अंदाज पाहून करावीत आणि सुरक्षित ठिकाणी हळद साठवावी. उन्हाळी तीळ पिकासाठी मध्यम जमिनीत आठ ते दहा दिवसांनी आणि भारी जमिनीत बारा ते पंधरा दिवसांनी सिंचन करावे. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्काची फवारणी करावी.

फळबाग व्यवस्थापन

कमाल तापमानाच्या वाढीमुळे संत्रा व मोसंबी बागांमध्ये फळगळ दिसून येत असल्याने बागांना नियमित पाणी द्यावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी देणे उपयुक्त ठरेल. संत्रा व मोसंबीच्या बागेत योग्य खतांची व जिब्रॅलिक ॲसिडची फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना सावली करून उन्हापासून संरक्षण द्यावे आणि झाडांच्या खोडाभोवती आच्छादन करावे. डाळींब व चिकूच्या बागांमध्येही तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर नियमित सिंचन करणे आणि झाडांना आधार देणे गरजेचे आहे.

भाजीपाला व्यवस्थापन

काढणीस तयार असलेल्या भाजीपाल्याची वेळेवर काढणी करावी. उन्हाळी भाजीपाला पिकांसाठी आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. मिरची, वांगे व भेंडी या पिकांमध्ये रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी. वेलवर्गीय झाडांना काठीचा आधार द्यावा.

फुलशेती व्यवस्थापन

फुल पिकांत तण नियंत्रणासाठी खुरपणी करावी व पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेली फुले वेळेवर काढावी.

तुती रेशीम उद्योगासाठी मार्गदर्शन

तुती बागेला हलक्या जमिनीत सात ते आठ दिवसांनी आणि भारी जमिनीत दहा ते बारा दिवसांनी पाणी देणे आवश्यक आहे. ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून पाण्याची बचत करता येईल. उन्हाळ्यात रेशीम किटक संगोपन टाळावे आणि संगोपनगृहाची स्वच्छता करावी. जमिनीला विश्रांती देऊन अंतर मशागत करावी.

पशुधन व्यवस्थापन

तिव्र उन्हाळ्यात जनावरे सावलीत किंवा गोठ्यातच ठेवावीत. त्यांना स्वच्छ व थंड पाणी दोन ते तीन वेळा पाजावे. हिरवा आणि सुका चारा एकत्र खाऊ घालावा. पाण्यात गूळ, मिठ आणि क्षार मिश्रण घालून दिल्यास जनावरांचे शरीरातील पाण्याचे संतुलन टिकून राहते. मात्र, अशा उपायांसाठी पशुवैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *