शेतकऱ्यांकडून झिरवळ यांना निवेदन
नाशिक जिल्हा सहकारी बँकेकडून सुरू (NDCC Bank) असलेली सक्तीची कर्जवसुली त्वरित थांबवावी आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली आहे. कर्जमाफीला उशीर झाल्यास व्याज माफ करून कर्जाची मुद्दल दहा हप्त्यांमध्ये वसूल करण्याचीही शिफारस करण्यात आली.
कोण-कोण होते उपस्थित?
या बैठकीत शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे,
आदिवासी कार्यकारी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे,
दिलीप पाटील, बाळासाहेब बोरस्ते, रमेश बोरस्ते, दगाजी अहिरे आणि आनंदा चौधरी यांनी सहभाग घेतला.
शासकीय विश्रामगृह, नाशिक येथे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली.
झिरवळ यांचे आश्वासन
कर्जाच्या मुद्दलावर वेगवेगळ्या श्रेणींनुसार व्याज आकारण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे.
* एक लाख रुपयांपर्यंत – २% व्याज
* पाच लाख रुपयांपर्यंत – ३% व्याज
* दहा लाखांपेक्षा अधिक – ५% व्याज
मात्र अद्याप अधिकृत शासन निर्णय झालेला नसून, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे मागण्यांचा पाठपुरावा केला जाईल, असे नरहरी झिरवळ यांनी सांगितले.
मागण्यांसंदर्भातील महत्त्वाच्या बैठका
* ११ एप्रिल – नाशिक येथे विद्याधर अनास्कर यांच्या उपस्थितीत प्राथमिक बैठक
* १८ एप्रिल – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दालनात मंत्रालय, मुंबई येथे चर्चा
* २३ एप्रिल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक
* उपस्थित: सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ, शिक्षण मंत्री दादा भुसे, नाशिक जिल्ह्यातील आमदार आणि संबंधित अधिकारी
मयत सभासदांसाठी दिलासादायक निर्णय
बैठकीत मयत सभासदांच्या कर्जावरील संपूर्ण व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्याबाबत संबंधितांशी चर्चा करून प्रयत्न करू असे आश्वासन मंत्री झिरवळ यांनी दिले आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील सुमारे ६,००० मयत सभासदांच्या वारसांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच जे शेतकरी लवकर कर्ज फेडतील, त्यांनाही व्याज माफीचा लाभ मिळवून देण्यासाठी चर्चा केली जाणार आहे.
संघटनेची पुढील पावले
शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.